सोलापूर:
जनतेच्या संयम व सहनशीलतेला सलाम…! कारण हद्दवाढ भागासह जुळे सोलापूर भागातून आजवर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता झाले; पण शहरात व जुळे सोलापूर भागात समसमान पाणी सोडण्याचा विषय मार्गी लावता आला नाही. सतत पाण्याचे नियोजन कोलमडले जाते हे सर्वश्रुत आहे. मूळ शहरात पाणीपुरवठा तीन दिवसांनी केला जातो, मग हद्दवाढ भागासह जुळे सोलापूर भागातून पाच दिवसांनी का? वारंवार हद्दवाढ व जुळे सोलापूर भागातील नागरिकांवरच अन्याय का केला जातो?
महिलांच्या समस्या एक महिलाच समजू शकते
वास्तविक पाहता नूतन “उपमहापौर” ज्ञानेश्वरी देवकर स्वतः जुळे सोलापूर भागातील रहिवासी आहेत. घरातील पाण्याचे व्यवस्थापन करणे ही महिलांचे मुख्य काम आहे आणि महिलांच्या समस्या एक महिलाच समजू शकते. उपमहापौरांच्या भागातच अपुरा पुरवठा का होतो? त्यांना या भागांतील महिलांना पाण्यासाठी होणाऱ्या त्रासाची जाणीव आहे. तरीही पाण्याच्या समान वाटपासाठी गांभीर्याने चर्चा होत नाही की उपाययोजनेच्या दिशेने पाऊल उचलले जात नाही, हा प्रश्न कायम आहे.
’सवतीच्या लेकरां’सारखी वागणूक का?
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात तीन दिवसाआड, शहराच्या उर्वरित भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हद्दवाढ भागासह जुळे सोलापूर वासियांना “सवतीच्या लेकरां”सारखी वागणूक का? याबाबत नूतन उपमहापौर देवकर यांनी तातडीने लक्ष घालून शहराप्रमाणेच तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करून घ्यावा, अशी मागणी होत आहे.
लोकप्रतिनिधी गप्प का?
हद्दवाढ भागासह जुळे सोलापूर भागातील लोकप्रतिनिधींना याची सर्व माहिती असताना देखील ते गप्प का आहेत? याचा नागरिकांनी बोध घ्यावा. शहराप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी एकाही लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, संघटना किंवा सामाजिक बांधवांनी आवाज उठविलेला नाही.
नियमित पाणीपट्टी भरूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने येथील रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. हद्दवाढ भागामध्ये पाच दिवसाआड पाणी येते, तेसुद्धा फार कमी वेळ राहते. पाणीपुरवठा अत्यंत अपुरा आणि कमी दाबाने होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
प्रमुख मागणी:
“जितके दिवस पाणी, तेवढीच पाणीपट्टी आकारण्यात यावी, तसेच पाणीपुरवठा तीन दिवसांनी करावा,” अशी आग्रही मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे.
✍️ संजय रूपनर (गोपनीय गाईड)

