राज्यभरातील पेसा (अनुसूचित क्षेत्र) भागातील शिक्षक पदभरती संदर्भात शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत १७ संवर्गातील पदभरतीस अखेर मान्यता दिली आहे. गुणवत्तेनुसार नियुक्तीचे आदेश देण्यात आले असून, प्रदीर्घ काळापासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता मार्गी लागणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने दि. ११ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून भरती प्रक्रिया राबविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने दि. २० फेब्रुवारी रोजी पुढील कार्यवाहीसंबंधी निर्देश जारी केले आहेत.
विविध जिल्ह्यांत होणार तात्काळ भरती प्रक्रिया
या पार्श्वभूमीवर अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भरती लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा
नव्या निर्णयानुसार, यापूर्वी जाहिरात प्रक्रियेद्वारे गुणवत्तेनुसार पात्र अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाच्या मर्यादेत नियुक्ती देण्याची कार्यवाही तात्काळ करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नियुक्तीनंतरही रिक्त राहणारी पदे ‘पवित्र’ (Pavitra Portal) प्रणालीद्वारे भरण्यात येणार आहेत.
आयुक्त (शिक्षण) सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या आदेशानुसार ही संपूर्ण प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
२०२४ मध्ये नियमित शिक्षक भरती प्रक्रिया सुरू!
यापूर्वी दि. १ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार ग्रामविकास विभागामार्फत पेसा क्षेत्रातील पदभरती करण्याची तरतूद करण्यात आली होती. तसेच, वित्त विभागाच्या मान्यतेनुसार रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, पेसा क्षेत्रातील आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका आणि त्याविरोधातील सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिकेमुळे भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती.
दरम्यान, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) २०२२ उत्तीर्ण अनुसूचित जमाती (एसटी-पेसा) उमेदवारांना गुणवत्तेनुसार नियुक्ती करण्यास पूर्वी परवानगी देण्यात आली होती. तसेच या उमेदवारांना ‘पवित्र’ पोर्टलमार्फत सर्वसाधारण भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधीही देण्यात आली होती. २०२४ मध्ये नियमित शिक्षक भरती प्रक्रिया पार पडली; मात्र न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेमुळे पेसा क्षेत्रातील अंतिम नियुक्त्या रखडल्या होत्या.
सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी: प्रशांत शिरगुर
”राज्यात अनेक वर्षांपासून पेसा क्षेत्रातील भरती रखडली होती. आता भरती ८० टक्के प्रमाणे झाल्यास स्थानिक उमेदवारांना संधी मिळेल, त्यामुळे भविष्यात बदली संदर्भात अडचणी येणार नाहीत. यामुळे हजारो उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. पेसा भरती प्रक्रियेप्रमाणे इतर जिल्ह्यांत सुद्धा जी रखडलेली पदे आहेत ती तात्काळ भरावीत, अशी आमची प्रमुख मागणी आहे. पेसा क्षेत्रात इतर जिल्ह्यांतील उमेदवारांना सुद्धा नोकरीसाठी संधी मिळाली पाहिजे, कारण पेसा भरती बंदीमुळे तिकडून हजारो उमेदवारांना इकडे नोकरी उपलब्ध झाली आहे.”
– प्रशांत शिरगुर (राज्य उपाध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असो. तथा पवित्र पोर्टल शिक्षक भरती)


